ठाणे : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वाढत आहेत. मुंबईहून रत्नागिरीच्या हेदवी गावाकडे निघालेल्या १० जणांचा मृत्यू झाला होता. ही घटना ज्या दिवशी घडली त्याच दिवशी मुंबई नाशिक मार्गावर भिवंडी तालुक्यातील कोशिंबे फाट्यावर एसटीनं चौघांना चिरलडल्याचं समोर आलं आहे. कोशिंबे फाट्यावर एसटीच्या विठाई या बसनं रस्ता ओलांडणाऱ्या दुचाकीस्वारांना आणि रस्त्याच्या कडेला उभे राहिलेल्या दोघांना चिरडलं. या प्रकरणी पडघा पोलीस ठाण्यात एसटी बस चालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पडघा पोलिसांनी या एसटी बस चालकाला ताब्यात घेतले आहे.
मुंबई नाशिक महामार्गावर असलेल्या भिवंडी तालुक्यातील कोशिंबी फाट्याजवळ २० जानेवारी रोजी दुपारच्या सुमारास दुचाकीस्वार आणि एक व्यक्ती आपल्या सहा वर्षीय चिमुकली सह रस्ता ओलांडत होते. त्यावेळी महामार्गावरून भरधाव वेगाने आलेल्या एसटी बसने या चौघांना चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुचाकीस्वार जयवंत ठाकरे आणि त्याच्यासोबत मागे बसलेले त्यांचे मित्र, एक सहा वर्षीय चिमुरडी जिज्ञासा जाधव आणि तिचे वडील अभिजीत जाधव हे जखमी झाले आहेत. अभिजीत जाधव आणि जिज्ञासा जाधव पायी रस्ता ओलंडण्यासाठी रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याच सुमारास एसटी महामंडळाच्या भरधाव वेगाने येणाऱ्या बसने चौघांना जोरदार धडक दिली. या घडलेल्या भीषण अपघातात सहा वर्षांची चिमुरडी जिज्ञासा जाधवसह अभिजीत जाधव आणि दुचाकी स्वार जयवंत ठाकरे यांच्यासह एक जण अशा चार जणांना एसटी बसने चिरडले. या अपघातात चार जण गंभीर जखमी झाले असून जिज्ञासा जाधव या सहा वर्षांच्या मुलीच्या डोक्याला गंभीर स्वरूपाची इजा झाली. तर जखमीवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. यामध्ये एका सहा वर्षांच्या चिमुरडीचा समावेश असून तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले.
अपघात सीसीटीव्हीत कैद
अपघाताची ही थरारक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. अपघातग्रस्त असलेल्या चिमुरडीच्या घरची आर्थिक परिस्थिती बिकट असल्याने एसटी महामंडळ कडून दवाखान्याचा खर्च मिळावा, अशी मागणी तिच्या नातेवाईकांनी केली आहे. तर याबाबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल साबळे यांच्याशी संपर्क साधला असता, एसटी बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्यामुळे हा अपघात झाला असून एसटी बस चालकाला अटक करण्यात आली आहे. त्याला नियमानुसार नोटीस बजावण्यात आल्याचे सांगितले.
दरम्यान, एकीकडे राज्यभर वाहतूक शाखेच्या वतीने ठिकठिकाणी रस्ते अपघात अभियान अंतर्गत जनजागृती सुरू आहे. विशेष म्हणजे, शासकीय वाहनचालकांमध्ये यासाठी मोठ्या प्रमाणात वाहनाचा वेग आणि वाहन चालवताना घेण्यात येणारी दक्षता यावर जनजागृती केली जात आहे आणि दुसरीकडे अपघात होत आहेत.