राजकारणात सामान्य लोकांना आपला वाटेल, असा राजकारणी सापडणे दुरापास्त. या पार्श्वभूमीवर सामान्यातील सामान्य माणूस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधू शकतो. त्या संवाद साधणाऱ्या प्रत्येकाला हा माणूस आपलाच आहे, असं वाटतं, हे खरं मुख्यमंत्र्यांचं मोठेपण आहे. मुख्यमंत्री म्हणून दीड वर्षातच त्यांनी आपल्या कामाचा वेगळा ठसा उमटवला आहे. महिला, उपेक्षित, गरीब, सामान्यांच्या हिताचे अनेक निर्णय त्यांनी मोठ्या धाडसाने घेतले. त्यामुळे सामान्यांचे मुख्यमंत्री म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम दरे तर्फे तांब येथून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा खडतर प्रवास सुरू झाला. ठाण्यात रिक्षाचालक ते राज्याचा मुख्यमंत्री हा त्यांचा प्रवास थक्क करायला लावणारा आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी दीड वर्षात अनेक लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. विशेषतः सामान्य जनता व गोरगरिबांना दिलासा मिळेल, अशा योजना त्यांनी आपल्या अनुभवाच्या जोरावर राबविल्या आहेत. सर्वसामान्यांची कामे स्थानिक पातळीवर व्हावीत, त्यांना विविध योजनांचे लाभ मिळावेत, यासाठी शासन थेट जनतेच्या दारात जात आहे. मुख्यमंत्र्यांच्या संकल्पनेतून "शासन आपल्या दारी"हे अभियान राबविण्यात येत असून, राज्यभरातून त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गरिबांसाठी बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना, ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना मोफत एसटीचा प्रवास, महिलांसाठी एसटी बस प्रवासात ५० टक्के सवलत अशा निर्णयामुळे मुख्यमंत्र्यांना सर्वसामान्यांचे आशीर्वाद मिळाले आहेत. राज्यातील एकही सर्वसामान्य- गोरगरीब गरजू रुग्ण पैशाअभावी उपचाराअभावी राहणार नाही, याची मुख्यमंत्री जातीने काळजी घेत आहेत. मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता कक्षाने रुग्णसेवेत उत्कृष्ट कामगिरी करून हजारो रुग्णांच्या जीवनात निरामय आरोग्याचा प्रकाश आणला आहे.
सामान्य शेतकरी कुटुंबातून पुढे आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांचे शेती व शेतकऱ्यांवर विशेष लक्ष आहे. शेतकरी हा आपल्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. "जगाचा पोशिंदा शेतकरी सुखी, तर जग सुखी " या उक्तीप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकरी सुखी कसा राहील , यावर महाराष्ट्र शासनाचा भर राहिला आहे. यानुसार राज्य शासनाची पावले पडत आहेत. याचाच एक भाग म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकारने गेल्या दीड वर्षात शेतकऱ्यांना तब्बल ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत केली आहे. दुष्काळ, अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, पूर, गारपीट अशा प्रत्येक नैसर्गिक आपत्तीत सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी भक्कमपणे उभे राहिले आहे.
शेतीच्या शाश्वत प्रगतीसाठी काही महत्वाच्या योजनांना वेग दिला आहे. त्यामध्ये नदीजोड प्रकल्प आणि जलयुक्त शिवारचा दुसरा टप्पा राबवून महाराष्ट्राला दुष्काळमुक्त करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्पा पाच हजार गावांत सुरू केला आहे.
आमच्या यवतमाळ जिल्ह्यांसाठी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी नुकतेच ८८१ कोटी रुपये निधीच्या विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन केले आहे. औद्योगिक विकासाच्या दृष्टीने यवतमाळ शहर समृद्धी महामार्गाला जोडण्यात येणार आहे. यवतमाळ जिल्ह्यात शासन आपल्या दारी अभियान कालावधीत १६ लाख नागरिकांना ६०१ कोटी रुपयांच्या निधीतून विविध योजनांचे लाभ वितरण करण्यात आले आहेत.यवतमाळ जिल्ह्याच्या विविध विकास कामांना पाहिजे तेवढा निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिली आहे.
संवेदनशील मुख्यमंत्री
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुरक्षा आणि शिष्टाचार न बाळगता सर्वसामान्यांना भेटतात. त्यांच्याशी संवाद साधतात. आपण जनसामान्यांचे मुख्यमंत्री आहोत, ही भावना बाळगून ते सर्वांना भेटत असतात. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून आल्यामुळे त्यांना परिस्थितीची पुरेपूर जाणीव आहे. विशेषतः सामान्य लोकांबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल ते स्वतः लक्ष घालून सगळी कामे करून घेतात. जनतेला भावलेले एक संवेदनशील मुख्यमंत्री म्हणून आज त्यांच्याकडे पाहिले जाते. वैद्यकीय मदत मागायला त्यांच्याकडे दररोज अक्षरशः रीघ लागते. प्रत्येकाला आपापल्या परीने ते नेहमीच मदत करतात. एखाद्याची समस्या जाणून घेऊन सभोवतालच्या माणसांशी चर्चा करून तत्काळ निर्णय घेण्याची, इतकेच नव्हे तर त्याची कार्यवाही झाली, की नाही, याचा पाठपुरावा करण्याची पद्धत मुख्यमंत्री शिंदे यांनी निर्माण केली. मुख्यमंत्री सामान्य नागरिक ते वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत प्रत्येकाशी ते सौम्य भाषेत संवाद साधताना दिसतात.
श्री. शिंदे साहेबांचे संघर्षमय जीवन सर्व चाहत्यांना मार्गदर्शक आहे. मागील दीड वर्षांत मुख्यमंत्री म्हणून राज्यासाठी केलेले काम हे कायम लक्षात राहील असे आहे. अशा या आमच्या मार्गदर्शक एकनाथ शिंदे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा मन:पूर्वक अभिनंदन आणि मन:पूर्वक शुभेच्छा...!
शब्दांकन : दत्तात्रय कोकरे विभागीय संपर्क अधिकारी . ( माहिती जनसंपर्क महासंचनालय )संपादन : संजय कडोळे.
आपल्या प्रतिक्रिया द्या....