आपण मोठ्या आनंदाने सांगतो की, आपली भारतीय संस्कृती जगात महान आहे. भारतात महाराष्ट्राला पुरोगामी मानले जाते, पण आपले हे दावे सपसेल खोटे आहे. एका अहवालानुसार भारत देशात सुमारे ११५० वृद्धाश्रम असून यामध्ये ९७ हजार वृद्ध स्त्री-पुरुष राहतात. आपल्या महाराष्ट्रात २४ वृद्धाश्रम मातोश्री वृद्धाश्रम योजने अंतर्गत बिना अनुदान तत्त्वावर चालविले जातात. पुण्याला सुसंस्कृत शहर समजले जाते, पण तेथे ६५ वृद्धाश्रम आहेत. महाराष्ट्राची लोकसंख्या १२ कोटी आहे. पैकी १ कोटी वृद्ध लोक महाराष्ट्रात आहेत. हिंदूना लाज वाटायला पाहिजे की समाजाला वृद्धाश्रमाची का गरज पडली? आई-वडिलांना सांभाळण्याची कुवृत्ती समाजात वाढलेली दिसून येते.
भारतात ११५० वृद्धाश्रम असून त्यात एकही मुस्लिम वृद्धाश्रमात नाहीत. मुस्लिम समाज आपल्या आई-वडिलांची योग्य ती काळजी घेऊन सांभाळतात. मुस्लिमांचे कुठेही वृद्धाश्रम नाहीत. हे त्यांच्या कडून शिकण्यासारखे आहे. हिंदूचे अनाथाश्रम, वृद्धाश्रम ठिकठिकाणी आहेत. सरकारलाही वृद्धाश्रम काढण्याची आवश्यकता भासणे ही अत्यंत लाज व शरमेची बाब आहे. अनाथाश्रम, वृद्धाश्रम हा हिंदू संस्कृतीला लागलेला कलंक आहे.
आपले आई-वडील मुलांना जड व्हावेत ही नीच वृत्ती समाजात बळावली आहे. मोदीजींनी आणखी १०० वृद्धाश्रम उघडण्याची घोषणा केली, ही किती शरमेची बाब आहे. अशाने खरचं भारताचा विकास होईल का? आई-वडिलांना सांभाळण्या ऐवजी घरात कुत्रे सांभाळता. त्या कुत्र्याचा महिन्याला पाच हजार खर्च येतो. आई-वडिलांना सांभाळण्याची लाज वाटते का? तुम्ही आई-वडिलांना वृद्धाश्रम दाखविता पण तुम्ही म्हातारे झाल्यावर तुमची मुले तुम्हाला वृद्धाश्रमात नेवून सोडतील. याचे थोडे सुद्धा भय तुम्हाला वाटत नाही का?
आई-वडील हीच आपली आयुष्यातील शेवटची संपत्ती असते. तेव्हा त्यांचा जन्मभर सांभाळ करणे हेच प्रत्येक तरुणाचे कार्य असते कारण आपल्याला लहानाचं मोठं त्यांनी यासाठीच केलेलं असतं की म्हातारपणी त्यांची आधाराची काठी आपण होणे गरजेचे असते. आई-वडिलांचा सांभाळ कुणी करायचा म्हणून दोघां भावामध्ये वाद निर्माण होऊन जन्मदात्याचीच हत्या झाल्याच्या घटना कलियुगात पहायला मिळतात. आपल्याला जन्म दिला आणि हे जग दाखविले. हालअपेष्टा भोगून तुम्हाला लहानाचे मोठे केले. आणि त्यांचा सांभाळ करण्याऐवजी वृद्धाश्रमात पाठवता. असे वागणे हे मुलांसाठी लाजिरवाणे आहे आणि एकीकडे आपण मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! म्हणून आई-वडिलांना देव मानतो.
वडिलांचे वचन आणि माता कैकयीच्या आज्ञेचे पालन करण्यासाठी प्रभु श्रीराम, आपल्या अंध माता-पित्याची न थकता सेवा करणारा श्रावण बाळ, आई-वडिलांच्या सेवेत खंड पडावयास नको म्हणून विठ्ठलाला प्रतिक्षा करायला लावणारा भक्त पुंडलिक. असे महान आदर्श आपल्या भारत देशात होऊन गेले. अशा आदर्श भारत देशामध्ये आई-वडिलांना सांभाळणे कठीण वाटणे, हे अतिशय दुदैवी आणि संकुचितपणाची परिसीमाच आहे.
समाजात सामाजिक जबाबदाऱ्या शिकविल्या जात नाहीत आणि एक मुलगा एक मुलगी पॕटर्न आल्याने काय झाले. एकुलता एक म्हणून मुलांचे फारच लाड होत आहे. तोच तुमच्यासाठी घातक ठरत आहे. आई-वडील मुलांच्या चुका नजरेआड करतात तसेच मुलांचा लाड केल्यामुळे मुले उनाड होत चालली आहे. आपल्या मुलांना संस्कार द्या, तरच वृद्धाश्रम कमी होतील. मुलांना योग्य संस्कार दिले नाही तर आपल्या पुढे भयानक वास्तव आ-वासून येत आहे, हे लक्षात ठेवा.
बाप म्हणजे बाप असतो
काळजी कणार मन असतं
मुलाची स्वप्न पूर्ण करण्यासाठी
स्वतःची स्वप्न विसरतो तो बाप असतो
मुलासाठी झटणारं अंतःकरण
संकटावर मात करणारा बाप असतो.
लेखक:-
पुरुषोत्तम बैसकार, मोझरकर
श्री गुरुदेव प्रचारक, यवतमाळ
फोन- 9921791677
आपल्या प्रतिक्रिया द्या....