भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात २९ आणि ३० एप्रिल रोजी यलो अलर्ट तर १ आणि २ मे रोजी आरेंज अलर्ट जारी केला आहे. या कालावधीत जिल्ह्यात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस विजांच्या कडकडाटासह पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील परिपक्व अवस्थेतील हरभरा, गहू, मोहरी, जवस आदी पिकाची आवश्यक काळजी घ्यावी. मेघगर्जना होत असताना घराच्या बाहेर पडू नये, शेतात कामाला जात असताना अशा कालावधीमध्ये मोबाइल फोन सोबत बाळगू नये. घरातील इलेक्ट्रिकल उपकरणे बंद ठेवावी. मेघगर्जना होत असताना झाडाच्या खाली उभे राहू नये व शेतात काम करत असताना सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.