वाशिम : एकंदरीत पर्यावरण व हवामानाच्या अभ्यासानुसार पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्टयामुळे आणि वारंवार धडकणाऱ्या मोठमोठ्या चक्रीवादळामुळे महाराष्ट्रात मोसमी वाऱ्यांना पोषक वातावरण निर्मिती होऊन महाराष्ट्रावर मोठमोठे पावसाळी ढगांची निर्मिती होत आहे. त्याचाच परिणाम म्हणून राज्यात कोकण किनारपट्टी, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र व विदर्भात काही ठिकाणी,काही भागात गडगडाटी,वादळी,मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. सद्यस्थितीत परतीचा पाऊस झालेला असून, जाता जाता हा पाऊस पूर्व विदर्भासह पाश्चिम विदर्भात ऐन नवरात्रोत्सव काळात हाहाकार माजवून जाणार असल्याचे वृत्त, वाशीम जिल्ह्यातील एकमेव हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी दिले आहे. या संदर्भात अधिक वृत्त असे की, जिल्हयाच्या मानोरा तालुक्यातील ग्राम रुई गोस्त्याचे सुप्रसिद्ध हवामान अभ्यासक गोपाल पाटील गावंडे हे आपल्या अचूक हवामान अंदाजामुळे सर्वत्र ओळखले जात असून, राज्यातील अनेक भागातील शेतकरी ग्रामस्थ हे त्यांच्या हवामान अंदाजानुसार आपल्या शेत पिकाचे नियोजन व शेतीची कामे ठरवीत असतात. त्यामुळे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबईचे विदर्भ प्रदेश उपाध्यक्ष असलेले महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी भ्रमणध्वनीवरून, हवामान अभ्यासक गोपाल गावंडे यांचेशी संवाद साधून, पावसाचे पुढील अंदाज जाणून घेतले असता त्यांनी सांगितले की, पश्चिम बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे,यंदाच्या नवरात्रोत्सव काळात पावसासाठी पोषक वातावरण तयार झाल्याने पुढील आठवड्यात दि. २६ ते २९ सप्टेंबर २०२५ पर्यंत चार दिवस राज्यासह मराठवाडा,संपूर्ण विदर्भ आणि वाशिम-यवतमाळ- अकोला-अमरावती जिल्ह्यात, काही ठिकाणी ढगफुटी सदृश्य वादळी पाऊस तर कोठे मुसळधार पाऊस होण्याची शक्यता दिसत आहे. शिवाय त्या पुढे दि. ०२ ऑक्टोबर पर्यंत बारीक सारीक ते रिमझिम पाऊस होण्याची शक्यता वाटत आहे. त्यामुळे ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी पावसा विषयी आधिक माहिती देतांना सांगीतले की,संपूर्ण नवरात्राच्या दिवसात नवदुर्गा उत्सव सुरू असतांना, भाग बदलवून कमी जास्त किंवा मुसळधार ते रिमझीम पाऊस होणार असून काही ठिकाणी आकाश स्वच्छ दिसत असतांना भर उन्हात अचानकपणे मुसळधार पाऊस पडणार आहे.त्यामुळे विशेषतः खेड्यापाड्याच्या ग्रामिण भागातील मातृशक्ती उपासकांनी शक्यतोवर नवदुर्गा स्थापनेसाठी पक्क्या सभागृहाची निवड करावी.किंवा श्री नवदुर्गा देवीचे मंडप पक्के तयार करून त्यावर ताडपत्री किंवा टिनपत्र्याचे शेड घ्यावे. तसेच दुपार नंतर पावसाची शक्यता गृहीत धरून महाप्रसाद व भंडाऱ्याचे कार्यक्रम किंवा जेवणावळ्या रात्री न ठेवता दिवसा दुपार पूर्वीच ठेवाव्यात. सर्वजनिक कार्यक्रम उघड्यावर न घेता सभागृहात घ्यावे.या पावसामुळे काही भागात नदी नाल्यांना,पांदण रस्त्यांना पूर येणार असून,धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागणार आहे.शिवाय अनेक ठिकाणी चक्रीवादळे, सोसाट्याचा वारा,ढगांचे विचित्र गडगडाट होऊन,विजा पडण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे.त्यामुळे या काळात शेतकरी व ग्रामस्थांनी आपली,कुटुंबाची,गुराढोरांची व घरादाराची काळजी घेण्याची गरज आहे. पुढे बोलतांना त्यांनी सांगीतले की, सध्या जोरदार पाऊस पडत असूनही, हवेतील उष्णता वाढत असून,श्रमिकांचे अंगातून घामाच्या धारा वहात आहेत.थंडीची सुरुवात पुढील ऑक्टोंबरच्या मध्या शिवाय होणार नसल्याचेही त्यांनी कळवीले आहे.