कारंजा : बुधवार दि.21 आणि दि. 22 ऑगस्ट रोजी सायंकाळी 07:00 च्या सुमारास संपूर्ण कारंजा तालुक्याला वादळी पावसाने झोडपले असून, ग्रामस्थांना विजेचा प्रचंड लखलखाट आणि ढगाच्या गडगडाटासह पाऊसाचा सामना करावा लागत आहे. शिवाय विज वितरणाची बत्ती वारंवार गुल होत असल्याने विजपुरवठा खंडीत होण्याच्या परिणामी खेड्यापाड्यासह कारंजा शहरातही अंधाराचे साम्राज्य बघायला मिळत आहे.त्याच प्रमाणे बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असल्याने त्याचाच परिणाम होऊन आणखी चार पाच दिवस, आजुबाजूचे जिल्हे,प्रांत इ ठिकाणी भाग बदलवीत हा पाऊस वादळी प्रकारात मुसळधार ते अतिमुसळधार प्रमाणात बरसणार असून,अनेक ठिकाणी विजा कोसळणार असल्याची संभावना असल्याने, शेतकरी,शेतमजूर,ग्रामस्थ, नागरीकांनी स्वतःच्या जीवित्वाची आणि आपल्या गुरावासरांची- शेळ्यामेंढ्याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. याविषयी साधारणत: एक महिन्या अगोदरच जिल्हयातील शेतकऱ्याचे लाडके हवामान अभ्यासक गोपाल विश्वनाथ गावंडे यांनी पूर्वानुमान दिलेले होते. यंदा पूरस्थिती निर्माण होऊन धरणे तुडूंब भरतील. नदी, नाले,तलावाची पूरस्थिती राहील. राज्याच्या काही भागात कमी जास्त परिस्थिती असली तरीही मात्र यंदा शेतकऱ्या करीता मात्र त्यांनी आनंदाची वार्ता दिलेली होती.व त्यांच्या अचूक अंदाजाप्रमाणे यंदा "शेतकऱ्याच्या खरीप आणि रब्बी दोन्ही हंगामात चांगली पिके होऊन शेतकरी राजाच्या उत्पादनात आणि उत्पन्नात वाढ होऊन शेतकरी समाधानी रहाणार असल्याचे" त्यांनी आपल्या प्रत्यक्ष मुलाखतीतून महाराष्ट्र राज्यस्तरिय पत्रकार परिषदेचे अध्यक्ष संजय कडोळे यांना कळविले होते. त्यांच्या अंदाजाप्रमाणे अकोला, अमरावती, वाशिम, वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, नागपूर, गडचिरोली भागात पाऊस कमीजास्त प्रमाणात, विजेच्या प्रचंड कडकडाटासह ,भाग बदलवीत कोसळत असून, पुढे चार ते पाच दिवस काही भागात मुसळधार पाऊसाने पुरस्थिती निर्माण होणार आहे.तरी शेतकरी व विशेषत: ग्रामस्थ शेतमजूरांनी आकाशात पाऊसाचे ढग दाटून आल्याचे दिसताच आपल्या शेळ्यामेंढ्या,गुराढोरासह सर्व शेतमजूरांना घेऊन शेतातून गावाकडे परत यावे.हिरव्या झाडाखाली मुळीच आश्रय घेऊ नये. आपली गुरेढोरे, शेळ्यामेंढ्या, दुचाकी,फोर व्हिलर वाहने,बसगाड्या पाण्याच्या पुरामधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करू नये.तसेच महत्वाचे म्हणजे विजाचा कडकडाट आणि ढगाचा गडगडाट सुरु असतांना विजेचे उपकरणे,दुरदर्शन,रेडीओ आणि मोबाईल (स्विच ऑफ) बंद करून ठेवावे.या संदर्भात सतर्कतेचा इशारा देतांना हवामान अभ्यासक गोपाल गावंडे आणि ज्येष्ठ पत्रकार संजय कडोळे यांनी, "शेवटी आपली सुरक्षा आपल्या हातात असल्याचे म्हटले आहे.